प्रश्न: सामान्य लोकांचे संकल्प पूर्ण का होत नाहीत? 
            
            
            
                उत्तर: प. पू. गुरुदेवांनी खुलासा केला की, तुम्ही जी साधना करता ती संकल्पासाहित करता.
                त्यामुळे यश मिळण्यात वेळ लागतो. निष्काम सेवा केल्यास फळ लवकर मिळते. काही भक्तांनी
                आटोक्यात असणारे व मर्यादित संकल्प केले. काहींचे पूर्ण झाले, काहींचे पूर्ण होण्याच्या
                मार्गावर आहेत. ज्यांचे संकल्प पूर्ण झालेले आहेत असे भक्त आता, गरज संपली म्हणून साधना
                कमी करीत चालले आहेत. पुढे ही साधना/उपासना बंद होणार असा स्वार्थी भाव किंवा उदासीन
                वृत्ती काय कामाची? संकल्पित कामे झाली तरी ठीक. नाही झाली तरी ठीक. उपासना सोडू नये
                अशी भक्तांची वृत्ती असावी. काही लोकांना भरपूर पैसा मिळतो परंतु पैसे हे पूर्णत्व
                नाही. पैशामुळे अहंकार फार वाढतो. मी पणा कमी व्हावयास पाहिजे. हा अहंकार अध्यात्म
                मार्गात फार मोठा धोका आहे. अध्यात्मात कितीतरी प्रगती केली असेल. परंतु जर अहंकार
                गेला नसेल तर काहीही उपयोग नाही. मोठ्या भांड्यात दूध भरून ठेवले व त्यात मिठाचा खडा
                पडल्यास संपूर्ण दूध नासते. तसा प्रकार होतो. तुमचा योग चांगला की तुमची व माझी भेट
                झाली. सहवासाने ह्या गोष्टी कळावयास लागतात. तुम्हांला जीवनात आवश्यक अशा सर्व गोष्टी
                मिळतील. परंतु त्यासाठी चिकाटी पाहिजे. निष्ठा पाहिजे. दृढ भाव व पूर्ण श्रद्धा पाहिजे.
                ह्या ठिकाणी स्थिर व्हावयास पाहिजे. (खंड. ३. १८)